पणजी -गोयंकारपण वृत्त
कोविड महामारी हाताळणीतील भ्रष्टाचार उघड झाल्यानंतरही डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट भाजप सरकारने ‘आजाराचा बाजार” चालुच ठेवला आहे. आपल्या घरीच विलगीकरणात असणाऱ्या कोविड रुग्णांना आरोग्य खात्यातर्फे देण्यात येणाऱ्या “होम आयजोलेशन किट” मध्ये औषधे, ऑक्सिमीटर तसेच इतर सामग्रीची कमतरता असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे निष्पाप कोविड रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ताबडतोब यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.
युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक व सेवादल चे प्रमुख संयोजक शंकर किर्लपारकर यांनी आज जारी केलेल्या संयुक्त पत्रकातुन आरोग्य खात्याच्या एकंदर कारभाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गोव्यातील विवीध आरोग्य केंद्रातुन गोळा केलेल्या माहितीवरुन कॉंग्रेस पक्षाने आक्षेप घेतल्यानंतर सरकारने ‘आयव्हरमेक्टिन’ गोळ्यांचा साठा मागील एक आठवड्यापासुन शुन्यावर आणला आहे. मागील पंधरवड्यापासुन ‘पारासिटामोल’ औषधांचा साठा मोठ्या प्रमाणात कमी असल्याचे दाखवण्यात आले आहे. अत्यंत खालच्या दर्जाचे ‘ऑक्सिमीटर’ होम आयजोलेशन किट मधुन देण्यात येत असुन, त्यातील बहुतेक चालतच नाहीत. अनेक रुग्णांना ऑक्सिमीटर मिळालेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन आरोग्य खात्याचा “सावळा गोंधळ” परत एकदा उघड झाला आहे.
कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या होम आयजोलेशन किट मध्ये सर्व औषधे, उपकरणे व इतर साहित्य उपलब्ध नसते. गरीब व निष्पाप रुग्णांना सरकार फसवीत आहे. ऑक्सिजन सिलींडरवर भ्रष्टाचार केल्यानंतर आता भाजप सरकारने होम आयजोलेशन किटवर माया जमविण्याचे धोरण राबविले आहे.
कॉंग्रेस पक्षाने अधिक प्रभावी टुल्सचा वापर करावा असा सल्ला देणाऱ्या आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना प्रत्युत्तर देताना युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी आरोग्यमंत्र्यांना भाजपला “मॅनीप्युलेटीव्ह मिडीया” असे घोषीत करणाऱ्या ट्विटरची आठवण करुन दिली आहे. कॉंग्रेस पक्ष वैज्ञानिक आधार असलेल्या टुल्सचाच वापर करतो असे सांगुन, ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी जागतीक आरोग्य संघटना, इंडियन मॅडिकल असोसिएशन, आयसिएमआर, बालरोग तज्ञांची संघटना तसेच वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार व तज्ञ यांनी दिलेल्या सल्ल्यानेच सरकारने वागावे ह्या ठाम मताचा कॉंग्रेस पक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे. दुर्देवाने या सर्व संघटनानी कोविड हाताळणीवर गोव्यातील भाजप सरकारला उघडे पाडले आहे असे ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी म्हटले आहे.
महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी भाजप सरकार हे संवेदनशील आहे अशा केलेल्या विधानाचा समाचार घेताना, गोमेकॉत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ज्या रुग्णांचा भाजप सरकारने एक प्रकारे खुनच केला त्यावेळीच या सरकारची संवेदनशीलता लोकांना कळली असा टोला हाणला आहे. गोमेकॉत रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा न करण्याचा सल्ला आरोग्यमंत्र्यांना कोणत्या तज्ञानी दिला होता? गोव्यातील रुग्णांचे हाल करुन सिंधदुर्गला ऑक्सिजन सिलींडर पाठविण्याचा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुणाकडून घेतला हे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे अशी मागणी बिना नाईक यांनी केली आहे.
बाबोळी येथिल गोवा वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प हा कॉंग्रेस सरकारनेच तयार केला होता. आज भाजप सरकारला त्याचा सांभाळही करता येत नाही. सदर प्रकल्पातील पॅथोलोजी विभागाच्या इमारतीची झालेली दैना हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या नविन सुपर स्पेशलिटी ब्लॉकच्या एका विभागाचे छप्पर दुसऱ्याच दिवशी कोसळले हे भाजपच्या भ्रष्ट कारभाराचे प्रमाणपत्र असल्याचे सेवादल प्रमुख संयोजक शंकर किर्लपारकर यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांची पक्ष निश्ठा, प्रामाणिकपणा व खरेपणा हे सर्वात मोठे योगदान आहे.हे एका पक्षातुन दुसऱ्या पक्षात उड्या मारुन आपली निश्ठा गहाण ठेवणाऱ्या विश्वजीत राणे यांनी ध्यानात ठेवावे. आमचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांच्याकडुनच त्यांनी हे धडे घेतल्याचे कॉंग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.
आरोग्यमंत्र्यांनी हिम्मत असल्यास आयव्हेरमेक्टिन गोळ्या वाटपाचा सल्ला, रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याचा सल्ला तसेच होम आयजोलेशन किटमध्ये औषधे व उपकरणे कमी देण्याचा सल्ला कुठल्या तज्ञानी त्यांना दिला होता हे स्पष्ट करावे.
गोवा रेजिडेंट डॉक्टर्स संघटना, गोवा वैद्यकीय संघटना, गोवा बालरोग तज्ञ संघटना यांनी केलेल्या गौप्यस्पोटांवरुन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व आरोग्य खात्याच्या भ्रष्ट व अनागोंदी कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. विश्वजीत राणेंनी सर्वात आधी या संघटनांच्या प्रतिनीधीं बरोबर जाहिर डिबेट करावे व मगच कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकरांबरोबर डिबेट करण्यासाठी यावे असे उघड आव्हान कॉंग्रेस नेत्यांनी दिले आहे.