पणजी : गोयंकारपण वृत्त
चक्रीवादळ तौक्तेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई गोवा सरकारकडून ठराविक वेळेच्या आत आणि पारदर्शक पद्धतीने देणे गरजेचे आहे, अशी ‘आम आदमी पक्षा’ची (आप ) मागणी आहे.
गोव्यातील जनतेचे पहिले कोविडमुळे मग लॉकडाऊन आणि नंतर तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व दुःख समजून घेण्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे अपयशी ठरले आहेत, असे प्रतिपादन राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी केले. तसेच त्यांनी विनंती केली की, मुख्यमंत्री सावंत यांनी गोवेकरांना नुकसानभरपाई लवकरात लवकर द्यावी.
“ ६० व्या ‘मुक्ती दिना ‘च्या दोन तासाच्या कार्यक्रमासाठी तीन करोड रुपये लगेच खर्च करण्यात आले. तसेच कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी कोणतीही विहित प्रक्रिया न पाळता 50 कोटी रुपये त्वरित मंजूर केले. परंतु ज्यांनी आपल्या प्रियजनांना कोविडमुळे गमावले किंवा ज्यांनी लॉकडाऊनमुळे उत्पन्न गमावले अशा लोकांना किंवा ज्यांचे चक्रीवादळामुळे घरं- पिके यांचे प्रचंड नुकसान झाले, अशा सर्वांना एक रुपया देखील नुकसानभरपाई देण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहे. ” असे म्हांबरे म्हणाले.
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत केवळ घोषणा केल्या असल्याचे सांगत म्हांबरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या विसंगत विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“सुरुवातीला मुख्यमंत्री म्हणाले की, २२ कोटींचे नुकसान झाले. नंतर वाढवून 40 कोटीचे नुकसान सांगितले. त्यानंतर दुसर्याच दिवशी अचानक हा आकडा 146 कोटींवर पोहोचला. अशा प्रकारच्या वादळांना आणि पूर घटनांना गोव्याने काय पहिल्यांदाच बघितले, असे नाही. झालेल्या नुकसानीचे अचूक व त्वरित मूल्यांकन करणे हा देखील आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग आहे ; ज्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहेत. आता ‘ड्रोन’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केवळ निवडणुका मोर्चासाठीच नव्हे तर लोकांच्या हितासाठीही करण्याची वेळ आली आहे, ” असे म्हांबरे म्हणाले.
नोकरशाहीच्या कासवछाप गतिच्या कारभाराबद्दल निराशा व्यक्त करताना म्हांबरे म्हणाले की, वादळाने बाधित गोयंकरांना दररोज त्रास होत असून त्यांना किमान अंतरिम मदत सरकारने द्यायला हवी. संपूर्ण गोव्यातून मदत/दिलासा मिळावा यासाठी “आप’ला अनेक विनंत्या आलेल्या आहेत”, असे सांगत म्हांबरे यांनी सांगितले की,आपचे स्थानिक कार्यकर्ते नागरिकांना अन्न, औषधे व किराणा सामान यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी पुढे सरसावले आहेत.
म्हांबरे यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की, सरकारने केवळ नुकत्याच झालेल्या नुकसानीची भरपाई न देता त्याचसोबत बाधित घर मालक, मच्छीमार आणि शेतकरी यांना त्यांच्या पायावर पुन्हा उभे राहीपर्यंत त्यांच्या भविष्यातील दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आर्थिक भत्ता दिला पाहिजे.
“वेळीच केलेल्या मदतीचे महत्व आहे. मान्सूनच्या पावसामुळे उद्या परिस्थिती आणखी खराब होईल. गोंधळलेल्या परिस्थितीमुळे लोकांच्या दुःखात आणखी भर पडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजकीय कार्यक्रम घेण्यापेक्षा आपल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता केली पाहिजे ”अशी सूचना म्हांबरे यांनी केली.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन सुधारण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्या वक्तव्याचे म्हांबरे यांनी स्वागत केले. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळे वारंवार होत असल्याचे निदर्शनास आणून म्हांबरे म्हणाले की, चक्रीवादळांचे केंद्रबिंदू शोधून, त्यांच्याशी सामना करण्यासाठी प्रयत्नशील व चाचणी यंत्रणा उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ञांची नेमणूक करण्याची गरज आहे, असे म्हांबरे यांनी सांगितले.