पणजी :गोयंकारपण वृत्त
विनाशाकडे नेणारी दुसरी लाट चालू असतानाच विशेषज्ञ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला असूनही सर्व गोवेकरांच्या वेळीच लसीकरणासाठीची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे कोणतीही योजना नाही. केवळ 15 लाख गोयंकरांचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी वास्तवात एका महिन्याचा कालावधी सावंत सरकारसाठी पुरेसा आहे. मात्र यासाठी गोवेकरांना भाजप हायकमांडच्या दयेवर सोडलेले दिसते, अशी टीका ‘आप’ गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी केली आहे.
म्हाबरे म्हणाले, की
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण करायला सांगितले असताना देखील वारंवार या गटातील व्यक्तींचे लसीकरण लसींच्या तुटवड्याअभावी थांबवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम होत आहे. तसेच 45 वरील वयोगटाचेच अद्याप लसीकरण पूर्ण झालेले नाही, ते पहिले पूर्ण करण्याचे आदेश आरोग्यमंत्रालयाने दिलेले आहेत.
“सरकार एका वेळी फक्त 35 हजार लसींच्या कुप्या घेत आहे. परिणामी सरकार आपले अपयश लपविण्यासाठी दररोज मर्यादित लोकांचेच लसीकरण करत आहे. हा सर्व प्रकार अतिशय धक्कादायक आहे. याप्रकारच्या गतीने संपूर्ण गोव्याचे लसीकरण करण्यासाठी एका वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल. आणि मग तिसरी लाट येईपर्यंत अधिक लोकांचा जीव जाईल.” असे ‘आप’ चे म्हांबरे म्हणाले.
दुसऱ्या लाटेने बर्याच तरुणांवर परिणाम केला आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्यातच विशेषज्ञांनी भाकीत केले आहे की, तिसरी लाट विशेषतः मुलांवर जास्त परिणाम करणारी असेल. आत्तापर्यंत सूमारे 16246 लहान बालकांना आणि 17 वर्षाखालील तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे, जी एकूण कोरोना बाधित संख्येचया 11.34 % टक्केच्या आसपास आहे.
सावंत सरकारने जर आवश्यक प्रमाणात लसींची खरेदी केली तर राज्यातील सर्व लोकसंख्येचे लसीकरण करणे सोपे होईल. परंतु सावंत सरकारने कोणत्याही प्रकारच्या लसींच्या जागतिक निविदांचा तपशील जाहीर केलेला नाही किंवा केंद्रापर्यंत तशी मागणी पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही. तसे केल्यास, असे दिसून येईल की भाजपा सरकार अपयशी ठरत आहे.
ते म्हणाले, की गोवा भाजपा आपल्या हायकमांडला नाराज करू इच्छित नाही, खाली पाहायला लावू इच्छित नाही. म्हणूनच मुख्यमंत्री सावंत गोव्याच्या हिताची मागणी केंद्राकडे मागताना
कचरतात.
“लसीकरणासाठी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे कोणती योजना आहे? त्यांनी लस पुरवठ्यासाठी जागतिक निविदा काढल्या आहेत का? त्यांनी याबाबत काही कृतीशील पावले उचलली आहेत का?” असे प्रश्न म्हांबरे यांनी उपस्थित केले