पणजी :गोयंकारपण वृत्त
स्थानिकांच्या मागणीनुसार रायबंदर येथील जुन्या जीएमसी इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे अपेक्षित होते,त्याएवजी आयुर्वेद केंद्र सुरू करण्याचा डाव रचल्याबद्दल ‘आम आदमी पक्षा’ने आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचा निषेध केला.
आपचे नेते वाल्मीकि नाईक यांनी लक्ष वेधले की, २०२० मध्ये मुख्यमंत्र्यांनी रायबंदर येथील जुन्या जीएमसी इमारतीची पाहणी केली आणि लोकांना आश्वासन दिले की, ते या इमरतीचे ३० बेड असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर करतील.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्वत: या इमारतीची पाहणी केली. त्यांनी या इमारतीची नव्याने दुरुस्ती करण्यावर भर दिला आणि रायबंदर,चिंबल,माशेल, दिवाडी तसेच जुन्या गोव्यातील लोकांच्या गरजा भागविण्यासाठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाईल,असे सांगितले होते.त्यावेळी स्थानिकांच्या आरोग्यास प्राधान्य असल्याचे सांगून लोकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. गरज पडल्यास रायबंदर येथील प्रस्तावित आरोग्य केंद्रातील सुविधा वाढविण्यात येतील असे ते म्हणाले.परंतु हे आश्चर्यकारक आहे की, मुख्यमंत्र्यांनी आता रायबंदरच्या आवारात आयुर्वेद केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे.
वाल्मिकी यांनी असा आरोप केला की, प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होण्यास लागणारा विलंब हा केवळ आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या दबावामुळेच झाला.
ते म्हणाले की,३० वर्षांसाठी आयुषकडे जीएमसी रूग्णालय १०० रुपये प्रति चौरस मीटर दराने देणे हे स्थानिक लोकांच्या इच्छा व आकांक्षाविरूद्ध आहे. सरकारने या निर्णयावर पुनर्विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.
श्रीपाद नाईक हे याच परिसरातील रहिवासी असून ते आपल्या परिसरातील लोकांच्या वैद्यकीय गरजांकडे इतके दुर्लक्ष कसे करु शकतात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी तिथे आयुर्वेद केंद्र सुरू करण्याची इच्छा ते कशी बाळगू शकतात, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.