गोवा सुरक्षित रहावा अशी प्रार्थना
मडगाव – गोयंकारपण वृत्त
केंद्र व राज्यातील भाजप सरकारकडुन कोविड हाताळणी व व्यवस्थापना विषयी कोणतीच अपेक्षा धरणे सध्या गुन्हा ठरणार आहे. भाजपचे दोन्ही सरकारे संपुर्णपणे अपयशी ठरली आहेत. आता गोव्यात लॉकडाऊन करण्याविषयी “पॉजिटीव्ह” निर्णय घेण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ मिळे पर्यंत आपण कोविडचे सर्व चाचणी अहवाल “निगेटीव्ह” येवोत व गोवा सुरक्षित राहो अशी प्रार्थना करतो,असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
कामत म्हणाले, की
आज बेजबाबदार व असंवेदनशील भाजप सरकारला सर्वोच्च न्यायालय व राज्यांतील उच्च न्यायालयांकडुन सणसणीत चपराक बसत आहे. दोन्ही भाजप सरकारे कोविड हातळणी व व्यवस्थापनात अपयशी ठरले हे आता न्यायालयात सिद्ध होत आहे. “कोविडची दुसरी लाट थोपविण्यासाठी भाजप सरकारकडे कसलाच कृती आराखडा तयार नव्हता हे आता उघड झाले आहे.
आज न्यायालयांकडुन हेकेखोर भाजप सरकारची कानउघाडणी होते ही चांगली गोष्ट आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे व कठोर आदेशामुळेच आता लोकांच्या सुरक्षेचा किरण पुन्हा एकदा दिसत आहे” असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
कामत म्हणाले, की कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये कोविडची त्सुनामी येणार व अर्थव्यवस्था कोसळणार असा स्पष्ट संदेश केंद्रातील मोदी सरकारला दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर त्वरित उपाययोजना हाती घ्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु, केंद्र सरकारने त्याकडे लक्ष न दिल्यानेच आज देश कोविडच्या घट्ट विळख्यात सापडला असुन, प्रत्येक घरचा जमा-खर्च कोलमडला आहे.
आज परत एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीना पत्र लिहून कोविड महामारी हाताळण्यासबंधी अनेक सुचना केल्या असून मोदी सरकारच्या गैरकारभारावर निशाणा साधला आहे. सरकारने फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी केलेल्या सुचनांकडे लक्ष दिले असते तर देशात कोविडची परिस्थिती खुप वेगळी असती असा दावा दिगंबर कामत यांनी केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गोव्यात प्रवेश करण्यासाठी कोविड निगेटीव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा आदेश दिला असून त्याचे मी स्वागत करतो. राज्यातील सीमांवर प्रवेश निर्बंध लादावेत, संपुर्ण गोव्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर करावा अशा अनेक मागण्या सरकारकडे केल्या होत्या. परंतु, हेकेखोर भाजप सरकारच्या प्राथमिकता वेगळ्या असल्याने त्यानी आमच्याकडे लक्ष दिले नाही. आज आम्ही जे सांगत होतो तेच न्यायालय सांगत आहे, असे दिगंबर कामत म्हणाले.
“आपला अहंकार बाजुला सारुन, राष्ट्रहितासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सुचनांची अमलबजावणी करेल अशी आशा आपण बाळगतो” असे कामत म्हणाले.