मडगाव -गोयंकारपण वृत्त
भाजप नेते डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय कोविड हाताळणीत सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवुन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी कोविड व्यवस्थापनाची जबाबदारी द्यावी अशी मागणी केली आहे. हे ऐकुन गोव्याचे मगो आमदार रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांच्या अंगावर रोमांच उभा राहिले असेल व त्यामुळेच त्यांनी गोवा सरकारला मुदतवाढ देण्याचे वक्तव्य केले असावे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील असंवेदनशील, बेजबाबदार व अकार्यक्षम भाजप सरकारला मुदतवाढ देणे, हे केवळ घटनाविरोधी नसुन तो एक महाभयंकर गुन्हा ठरणार आहे असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
गोव्यात आगामी निवडणूका दोन वर्षे पुढे ढकलाव्यात व विद्यमान सरकारला मुदतवाढ द्यावी किंवा राष्ट्रपती शासन लागु करावे,असे वक्तव्य मगो आमदार सुदिन ढवळीकरांनी करणे धक्कादायक आहे. ते एक ज्येष्ठ आमदार असुन त्यांना घटनेचे जाण असायलाच पाहिजे. भारतीय घटनेत कोणत्याही सरकारला मुदतवाढ देण्याची तरतुद नाही,असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.
आज केंद्र व राज्यातील भाजप सरकाराने सत्तेत राहण्याचा नैतिक हक्क गमावला आहे. देशवासीय आज भाजप सरकारला कोविड व अर्थव्यवस्थेच्या गैरव्यवस्थापनाबद्दल शिव्याशाप घालत आहेत. परंतु, मगोचे आमदार भाजप सरकारला मुदतवाढ देण्याची दिवसाची स्वप्ने पाहत आहेत असा टोला गिरीश चोडणकर यांनी हाणला.
सत्तेपासुन जास्त काळ दूर राहिल्यामुळे मगो आमदार सुदिन ढवळीकरांची घुस्मटमार सुरू झाली आहे का व त्यावर डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडुन मंत्रीमंडळात स्थान देण्याच्या उपचाराची ते वाट पाहत आहेत का,असा खोचक प्रश्न गिरीश चोडणकर यांनी विचारला आहे.
चोडणकर म्हणाले, की
मगो आमदार सुदिन ढवळीकरांनी बरोबर वेळ साधुन हे वक्तव्य केले आहे,हे सांगायला ज्योतिष्यची गरज नाही. राजकीय संधिसाधूपणा व सत्तेची लालसा त्यांच्या वक्तव्यातुन स्पष्ट दिसत आहे. खरेतर गोव्यात लोकांना न्याय देणारा पुर्णवेळ राज्यपाल देण्याची मागणी करणे त्यांच्याकडुन अपेक्षित होते. परंतु त्यांनी आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. गोव्यात जे काही चालले आहे ते दुर्देवी आहे व गोव्यातील राजकारणाने गाठलेली खालची पातळी त्यातुन प्रतिबिंबीत होते.
भाजप नेते डॉ. सुब्रम्हण्यम स्वामींचे वक्तव्य ऐकल्यानंतर, सुदिन ढवळीकरांना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरींच्या आशिर्वादाने अनुभवलेले “अच्छे दिन” आठवले असतील. आमदार ढवळीकर yani आता “आत्मनिर्भर” बनुन डॉ. प्रमोद सावंतांच्या मंत्रीमंडळात “स्वयंपुर्ण” होण्याचा विचार करीत असावेत असा टोमणा गिरीश चोडणकर यांनी हाणला आहे.
गोमंतकीय जनता राजकीय घडामोडी उघड्या डोळ्यानी बघत असुन, कोविड आजाराने लोक मरत असताना आपला राजकीय स्वार्थ साधण्याची खेळी खेळणाऱ्यांना जनता कदापी माफ करणार नाही. आज गोव्यात सरासरी प्रतिदीन ७० लोक कोविडने दगावत आहेत. निसर्गाने आपला कोप प्रकट केला असुन, आपण आताच शहाणे होणे गरजेचे असल्याचे
चोडणकर यांनी सांगितले.