मडगाव – गोयंकारपण वृत्त
गोव्यातील भाजप सरकारला गोमंतकीयांचे भले झाल्याचे पडलेले नाही हे परत एकदा उघड झाले आहे. गोव्यात तुटवडा असताना महाराष्ट्राला प्राणवायूचे पुरविण्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेले आश्वासन आमचा दावा खरा ठरविते,असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचे आमदार दीपक केसरकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्गला गोव्यातुन प्राणवायु देण्याचे आश्वासन दिल्याचे वक्तव्य केले होते त्यावर दिगंबर कामत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
ते म्हणाले, की गोव्यात रुग्णांचे ऑक्सिजन अभावी हाल होत असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्गला कोठुन व कसा ऑक्सिजन पुरवठा करणार ते स्पष्ट करावे अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.
आज रुग्णांना प्राणवायुच्या कमतरतेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळातील डॉक्टर ऑक्सिजनच्या एका सिलींडरवर तीन रुग्णांना प्राणवायु देत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन सिलींडरसाठी धावाधाव करावी लागत आहे. युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत करुन लोकांना ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे कामत यांनी सांगितले.
मी काल सर्व पक्षिय शिष्टमंडळाकडुन गोव्यातील ऑक्सिजनच्या पुरवठयांची पाहणी करण्याची सरकारकडे मागणी केली होती. परंतु, मुख्यमंत्री वा आरोग्यमंत्र्यांनी त्यावर अजुनही उत्तर दिलेले नाही. प्रधानमंत्री कार्यालयाने मागितलेला ‘ऑक्सिजन ऑडीट’ रिपोर्ट सरकारने जाहिर करावा. सरकार ऑक्सिजन व्यवस्थापनावर श्वेतपत्रीका काढण्यास का घाबरते हे सरकारने सांगावे अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.
जर सरकारने आताच पाऊले उचलली नाही तर ऑक्सिजनच्या अभावामुळे गोव्यात मृत्यु होतील व त्याची संपुर्ण जबाबदारी भाजप सरकारवर राहिल,असा इशारा दिगंबर कामत यांनी दिला आहे.