पणजी :गोयंकारपण वृत्त
कोविड निर्बंध तसेच स्वेच्छेने बाजारपेठेत लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे सामान्यांना आर्थिक फटका बसला आहे. यासाठी गोवा सरकारकडे दैनंदिन कमाईवर घर अवलंबून असलेल्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी ‘आम आदमी पक्षा’ने (आप ) केली आहे.
राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, कोरोनाच्या निर्बंधामुळे टॅक्सी चालक आणि ऑटो रिक्षाचालकांना सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे. कारण मुख्यत्वे यांचा व्यवसाय ज्या गर्दीच्या ठिकाणी अर्थात बाजारपेठांसारख्या ठिकाणी असायचा तीच ठिकाणे आता बंद आहेत. त्यामुळे हा वर्ग प्रचंड आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशा वेळी,सध्याची आपत्कालीन परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालक यांना भरपाई म्हणून सरकारने काही आर्थिक मदत जाहीर करण्याची गरज आहे.
म्हांबरे म्हणाले की, टॅक्सी- रिक्षा चालक हे आमचे गोयंकरांचे प्रिय बंधू आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे हसतमुखपणे जनतेला सेवा दिली आहे. मात्र या संकटकाळात त्यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे, त्यामुळे शासनाने त्यांना त्वरित आर्थिक साहाय्य करावे. सरकारची या वर्गाला मनापासून मदत करण्याची साफ नियत असेल तर निश्चितच सरकारला पैशांची कमतरता भासणार नाही. म्हांबरे यांनी सांगितले, की गोव्यातील या सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडे असणाऱ्या सुवर्ण महोत्सवासाठीच्या 300 कोटी रुपयांमधील छोटासा हिस्सा याकामी उपयोगी येऊ शकेल. दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारने रिक्षा-टॅक्सी चालक, बांधकाम मजूर यांना प्रत्येकी पुन्हा एकदा 5000 ₹ (पाच हजार) इतकी मदत जाहीर केली व त्याचे वितरण देखील सुरू केले.दिल्लीत अशाप्रकारची मदत केजरीवाल सरकारने गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन कालावधीत देखील केली होती.
अचानकपणे बाजारपेठा बंद करण्याच्या निर्णयाद्वारे विक्रेत्यांना, ग्राहकांना आणि स्थानिक शेतकऱ्यांना नाहक त्रास देणे बंद करावे, असे आवाहन म्हांबरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
काल कुठल्याही प्रकारचा इशारा न देता पणजी नगरपालिका मार्केट अचानक बंद केल्याचा उल्लेख करीत त्यांनी सांगितले की, वेळीच माहिती दिली गेली असती,तर बऱ्याच विक्रेत्यांना व फळभाज्या व भाजी विक्रेत्यांचा होणारा तोटा टाळता आला असता.
Keep Reading
Add A Comment