पणजी: भाजपा सरकारने आरोग्य क्षेत्रात चालवलेल्या गैरकारभार, भ्रष्टाचार आणि गोंधळामुळे गोव्यातील कॉविडची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याचा दावा करीत, गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी चाचणी सुविधा वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच अहवाल तात्काळ द्यावा असे म्हटले आहे.
“गोव्यात कोविडची परिस्थिती नियंत्रणात नसल्यामुळे कोविडचा सामना करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. चाचणी केंद्रे वाढवण्याची गरज असून सरकारने ‘मोबाईल टेस्टिंग प्रयोगशाळां’च्या माध्यमातून प्रत्येक गावात पोहोचले पाहिजे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या सूचनेकडे लक्ष न दिल्यास भविष्यातील आपत्तीसाठी ते स्वतःच जबाबदार असतील. ” असे म्हार्दोळकर म्हणाले.
“चाचणीचा अहवाल तातडीने देण्यात यावा, जेणेकरून पोजिटिव्ह आढळल्यास औषधोपचार सुरू करता येईल. अन्यथा औषधोपचारात उशीर झाल्यास रुग्णांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. ” असे म्हार्दोळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
त्यांच्या मते, चाचणी केंद्रे वाढवण्यासाठी सरकारने काहीच उपाय घेतले नसल्याने, सध्याच्या चाचणी केंद्रावर गर्दी होत आहे.
“हेच कारण आहे की कोविडची लक्षणे असूनही लोक चाचणी करायला जात नाही आणि घरीच राहण्यास पसंद करतात. त्यांना योग्य औषधे मिळत नसल्याने त्यांची तब्येत ढासळते आणि त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले जाते. या कारणास्तव आम्हाला प्रत्येक गावात आणि जिथे प्रकरणे वाढली आहेत तिथे ‘मोबाईल चाचणी प्रयोगशाळे’ नेण्याची आवश्यकता आहे. ” असे म्हार्दोळकर म्हणाले.
यामुळे विद्यमान चाचणी केंद्रांवर गर्दी कमी होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
सरकार प्राथमिक स्तरावर चाचणी करण्यात आणि नंतर संक्रमित लोकांना उपचार देण्यास अयशस्वी झाल्याचा त्यांनी आरोप केला.
“जर तुम्ही (भाजप सरकार) चाचणी केंद्रे वाढवू शकत नसाल तर आम्हाला चाचणी घेण्यास परवानगी द्या. आम्ही ते व्यवस्थित करू आणि लोकांना योग्य प्रकारे औषधे घेण्यास मदत करू. ” असे म्हार्दोळकर म्हणाले.
ते म्हणाले की, सध्या असलेल्या चाचणी केंद्रांवर बरेच लोक सामाजिक अंतर न राखता रांगेत उभे असतात. ह्याच्यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे.
“असे काही प्रकार आहेत जेथे कोविड लस आणि तपासणी एकाच प्राकारात केली जात आहे, जेथे निगेटिव्ह लोक पोजिटिव्ह लोकांच्या संपर्कात येत आहेत. ही व्यवस्था सुलभ करण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. ” असे ॲड म्हार्दोळकर म्हणाले.
१८ ते 45 वर्षे वयोगटातील व्यक्तींना घोषित केलेल्या तारखेला लस देण्यास अपयशी ठरल्याबद्दल भाजपा सरकारवर जोरदार टीका करीत म्हार्दोळकर म्हणाले की भाजपाने ह्या कार्यक्रमाला हेतुपुरस्सर उशीर केला आहे, जेणेकरुन खासगी रुग्णालय मणिपालला (ज्याने ही लस देण्याची तयारी दर्शविली आहे) पैसे घेवून फायदा होइल आणि भाजपला त्यातून कमिशन मिळेल.
“तरुणांनी या लसीसाठी खासगी रुग्णालयांना
पैसे का द्यावे, जेव्हा सरकारने ती विनामूल्य जाहीर केली होती. या सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली आहे की लोक भीतीमुळे खाजगी रुग्णालयांतून सेवा घेतील आणि त्यामुळे भाजपा नेत्यांना त्याचा फायदा होईल. ” असा आरोप म्हार्दोळकर यांनी केला.
म्हार्दोळकर यांनी निदर्शनास आणून दिले की, गोव्याच्या मृत्यु दरांमुळे लोकांमध्ये भीती आहे आणि म्हणूनच तरुणवर्ग या संकटात सामाजिक काम करायला पुढे येत नाहीत. एकदा तरुणांना लस दिली की, त्यांची भीती जाईल आणि काम करण्याचा आत्मविश्वास मिळेल.” असे म्हार्दोळकर म्हणाले.
खासगी रुग्णालयाला प्रथम लस कशी मिळाली हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.